भारतीयांमध्ये सर्वात उत्साहाने साजरे होणारे प्रामुख्याने दोनच उत्सवी सण समजले जातात. एक म्हणजे गणपती बाप्पांचा ‘गणेशोत्सव’ आणि दुसरा प्रकाशाचा दीपोत्सव म्हणजेच ‘दिवाळी’. भारतीय म्हणजे मग धर्म कुठलाही असुद्यात. या दोन प्रमुख उत्सवी सणा मध्ये प्रत्येकाचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असा सहभाग हा असतोच. त्यामुळेच हे दोन्हीही सण खऱ्या अर्थाने सर्वधर्मीयांचे. दिवाळी आता अगदी काही दिवसांवर येवून ठेपली आहे. घराची रंगरंगोटी, सणासाठी नवे कपडे खरेदी, रोषणाईची तयारी याची लगबग सुरू झाली आहे. त्याबरोबरच खरी कसोटी असते ती महिलावर्गाची. सणाची खरी ‘लज्जत’ वाढते ती दिवाळीसाठी केलेल्या फराळामुळेच. दिवाळीला परिधान केलेले नवे कपडे, रोषणाई, दारात काढलेली रांगोळी, जमा झालेले पै-पाहुणे, फटाक्यांची आतषबाजी ही तर आनंदोत्सवाची पार्श्वभूमी झाली. अभ्यंगस्नानानंतर पुढ्यात आलेला ‘फराळ’ जर चवदार नसेल, काटेरी चकली जर बिघडली तर दिवाळीची सारी ‘रंगतच’ बिघडते. त्यामुळे महिलावर्गाचं सगळ्यात टेन्शनचं काम म्हणजे दिवाळीचा ‘फराळ’ कसा बनवायचा ? सगळ्यांचाच हात अगदी सुगरणीचा असतो असं थोडंच आहे. त्यात पुन्हा दिवसभर घरातली नियमित कामे उरकून ‘फराळाचा’ घाट घालायचा…..त्यात नोकरी करणाऱ्या महिला असतील तर आणखीनच अवघड. बरं दिवाळीच्या फराळातील जवळपास सर्वच पदार्थ एरवी देखील अगदी बारा महिने विकत मिळतात. मग एव्हढं ‘टेन्शन’ का घ्यायचं ? हीच तर खरी गंमत आहे. हॉटेल किंवा हलवाईच्या दुकानात मिळत असले तरी त्या पदार्थांना घरची चव थोडीच असते. म्हणून तर ज्यांना फराळ बनवणे जमत नसेल किंवा फराळ बनवायला उसंतच नसेल अश्यांना हवा असतो घरगुती चवीचा दिवाळीचा फराळ. तसे प्रत्येक गावात, शहरात घरगुती चवीचा दिवाळीचा फराळ तयार करणारे स्वयंपाकी, केटरर्स, महिलांचे गट कार्यरत आहेत. दिवाळीच्या निमित्ताने उपजीविकेसाठी अर्थार्जन करून देणारा हा व्यवसाय सगळीकडेच दिसतो. पण त्यातही पदार्थांची गुणवत्ता, चव आणि दर याची उत्तम सांगड घातलेले या व्यवसायात नाव कमावतात.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुप सारख्या गावातील शेतात राबणाऱ्या महिलांच्या रानवेध बचतगटाच्या माध्यमातून गेल्या सात वर्षांपासून घरगुती चवीचा गुणवत्तापूर्ण असा दिवाळी फराळ माफक दरात उपलब्ध करून देणाऱ्या मंद्रुप येथील अनिल विठ्ठल कामतकर यांच्याविषयी थोडेसे….१९८३-८४ च्या सुमारास ‘वाढपी’ म्हणून उपजीविकेचे काम सुरू करणाऱ्या अनिल कामतकर यांनी आपल्या अंगीभूत मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर प्रमुख आचाऱ्याचा मदतनीस झाल्यावर पुढे १९८९ पासून स्वतंत्रपणे नीलिमा केटरर्स म्हणून आपल्या व्यवसायाला प्रारंभ केला.
केटरर्स म्हणून शहर-ग्रामीण भागात आपला व्यवसाय करीत नावलौकिक प्राप्त केला. त्यानंतर ग्रामीण भागातील महिलांना आत्मनिर्भर व स्वावलंबी बनविण्याच्या उद्देशाने मंद्रुप येथील रानवेध महिला बचतगटाच्या माध्यमातून चविष्ट अशा दिवाळी पदार्थांची निर्मिती सुरू केली. यामाध्यमातून रानवेध महिला बचतगटाच्या महिलांना रोजगार उपलब्ध झाला. या कामात अनिल कामतकर, त्यांच्या पत्नी सौ. अनिता कामतकर आणि स्नुषा सौ. केतकी विनोद कामतकर असं संपूर्ण कुटुंबच कार्यमग्न असतं. यात कच्चामाल आणणे, पदार्थ तयार करणे, मालाचे पॅकिंग, पार्सल या अंगमेहनतीच्या कामाचा समावेश असतो. कारण हे पदार्थ मशिनद्वारे नाही तर हाताने केले जातात. मागणीनुसार पुरवठा करताना उत्पादनाचे गणित हे केवळ सराव आणि अंगमेहनतीवर अवलंबून असते. अर्थात श्रमाचा गंध हा पदार्थाची चव वाढवितो. म्हणूनच अनिल कामतकर यांच्या रानवेध दिवाळी फराळाला ग्राहकांकडून मागणी असते.
कामतकर यांच्या रानवेध दिवाळी फराळाला फक्त सोलापूर शहर-जिल्ह्यातच नाही तर परदेशातूनही मागणी असते. अगदी परवाच तयार पदार्थांचा पहिला लॉट पार्सलने अमेरिकेला पाठविण्यात आला आहे. अतिशय माफक दरात उपलब्ध असणाऱ्या रानवेध दिवाळी फराळाच्या पॅकेजमध्ये खारीबुंदी, बुंदीचा लाडू, रव्याचा लाडू, बेसनाचा लाडू, शंकरपाळे, चकली, पोह्याचा चिवडा, मुरमुऱ्याचा चिवडा, खमंग शेव अशा चटकदार आणि लज्जतदार पदार्थांचा समावेश असतो. अगदी घरगुती चवीचा हा फराळ असल्याने महिला वर्गाकडून कामतकरांच्या रानवेध दिवाळी फराळाच्या पॅकेजची मागणी वाढत चालली आहे. वेळेत आपल्या घरी रानवेधचा दिवाळी फराळ यावा याकरिता 9850434353 या क्रमांकावर व्हॉट्सअप द्वारे आपली ऑर्डर आजच नोंदवा असे आवाहन कामतकर यांनी केले आहे.
:- मुकुंद मधुकर हिंगणे.
Leave a reply to Rakesh Narwani उत्तर रद्द करा.